Friday, June 23, 2017

शुक्रताल भागवत सप्ताह

आम्ही २ फेब्रुवारी रोजी दिल्ली वरून १३७ कि. मी. अंतरावर असलेल्या शुक्रताल या गावी भागवत सप्ताहा साठी गेलो. परीक्षित राजाला आठ दिवसांनी मरण येणार असते, महर्षी शुकाचार्य यांनी भागवत कथा  सांगितली आणि परीक्षित राजा अमर झाला, त्यामुळे या ठिकाणचे खूप महत्व आहे,या ठिकाणी असलेल्या महाकाय वटवृक्षाखाली हि कथा ऐकावी असे म्हणतात,त्यामुळे आमची भागवत कथा याच वटवृक्षाखाली ७ दिवस आयोजित केली होती.        
                   

                                                         


हि भागवत  कथा सांगण्यासाठी श्री.गोविंग गिरीजी महाराज उर्फ अशोकजी व्यास हे आले होते,त्यांच्या रसाळ वाणीतून 
भागवत कथा ऐकण्याचा आम्हाला लाभ मिळाला. सात दिवस त्यांनी आपल्या रसाळ वाणीने आम्हाला मंत्रमुग्ध केले .
त्यांनी कथेमध्ये एखादे भजन केले कि,आम्हा श्रोत्यांना  एकदम स्फुरण चढायचे आणि सगळे भान हरपून आणि तल्लीन होऊन नाचायला लागायचे . 



भागवत कथा चालू असताना एकादशी आली,तो दिवस पवित्र म्हणून आम्ही सकाळी ५ वाजता उठून गंगेवर स्नानासाठी गेलो तिथे जाताना ताल,आणि मृदंग याचा गजर करत आणि मुखाने देवाचे नाव घेत आम्ही सर्वजण गेलो आणि 
गंगेत स्नान केले. 


लोकांनी स्नान केल्यानंतर  गंगेची पूजा केली आणि गंगेत दिवे सोडले . तसेच परत आम्ही मुक्कामी जाताना भजन 
करतच गेलो . 



एक दिवस आम्ही दुपार नंतर थोडा वेळ काढून ६० कि.मी. अंतरावर , कौरव आणि पांडव याची राजधानी 
असलेल्या हस्तिनापूर  या गावी गेलो. आता तिथे ५००० वर्ष नंतर कौरव आणि पांडव याच्या काहीही खुणा नाहीत, परंतु 
आम्हाला उत्सुकता म्हणून आम्ही तिथे गेलो, आता या ठिकाणी जैनांची सुंदर सुंदर मंदिरे बांधलेली आहेत. 


आम्ही हि मंदिरे बघितली तसेच पांडव ज्या शिव मंदिरात पूजा करत असत ते मंदिर बघितले. 

आमचा दिनक्रम हा सकाळी ७.३० ला सुरु व्हावयाचा. प्रथम विष्णू सहस्त्रनाम ,त्यानंतर साधुसुद्धा ग्रंथाचे पारायण 
त्यानंतर नास्ता,१ तास ब्रेक त्यानंतर १० ते २ वाजेपर्यंत श्रीमान अशोकजी व्यास यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा. 


भागवत कथा सुरु होण्याचे आधी श्री.ज्ञानेश्वर महाराज साधू याच्या हस्ते भागवत पोथीची आरती होत असे. मधून मधून 
महाराज भजन म्हणत असत,त्यावेळी सर्व श्रोते इतके उत्साहाने उठून नाचत आणि भजनात एकदम तल्लीन होत असत 


स्वामीजींचे साथीदार तर इतक्या सुंदर आवाजामध्ये गात कि ते भजन संपूच नये असे वाटत असे . ज्यावेळी 
कृष्णाचा जन्म झाला तेव्हा तर सर्व श्रोते बेभान होऊन स्वतः भोवती गिरक्या घेऊन नाचायला लागले,त्यात वृद्ध 
स्त्रिया,पुरुष पण सामील होते . ज्या दिवशी कृष्ण जन्म आख्यान होते त्या दिवशी कृष्णाला पाळण्यात घालून त्याचे 
नाव ठेवण्यात आले . 


श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला , त्यादिवशी गोवर्धन पर्वत केला आणि काला खाल्ला त्या दिवशी छपन्न भोग 
देवासमोर मांडले होते . 



श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाच्या दिवशी कृष्ण आणि रुक्मिणी तयार करून त्यांचा विवाह लावला . त्याच दिवशी 
महाराजांच्या भक्तांनी भारुडे सादर केली,त्यांना जे बक्षीस मिळाले ते त्यांनी साधू महाराज यांच्या स्मारकासाठी 
दान दिले . एकनाथ महाराजांनी रचलेली भारुडे छान होती 



                  आम्ही एक दिवस शुक्रताल हे गाव बघण्यासाठी गेलो,तिथे अनेक देवी देवतांच्या उंच उंच मुर्त्या बनवलेल्या होत्या  . तसेच एका गार्डन मध्ये कल्पवृक्ष पण होता, त्याचे खूप महत्व आहे असे कळले. 


कल्पवृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. त्या गार्डन मध्ये वेगवेगळी औषधी 
वनस्पती देखील होत्या . तसेच खूप जुनी आणि दुर्मिळ झाडे होती .                                                           


काही स्त्रिया कल्प वृक्षाला प्रदक्षिणा घालत होत्या . गार्डन मध्ये वेगवेगळ्या सुंदर मुर्त्या पण होत्या . 


दररोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन असायचे, एक दिवस चैतन्य महाराज 
देगलूरकर महाराजांचे कीर्तन होते,त्यादिवशी श्रोते वेळेच्या आधी सभा मंडपात हजर होते,सर्वाना त्यांचे कीर्तन ऐकण्याची एव्हढी उत्सुकता होती कि सगळे वेळेच्या आधी हजर होते,त्यांचे कीर्तन कधी संपूच नये असे वाटत होते . दोन ते अडीच तास सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत होते,कीर्तन कधी संपूच नये असे वाटत होते . त्या दिवशी खुद्द अशोकजी 
व्यास सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी हजर होते . 


सातव्या  दिवशी जेव्हा श्रीकृष्णाचा अंतकाळ झालेला सांगितलं आणि भागवत कथा संपली तेव्हा आमच्या मनाला 
खूप हुरहूर वाटली ,कारण महाराजांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकता ऐकता कधी सात दिवस सम्पले  कळलेच नाही . 
शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन झाले आणि सप्ताह समाप्ती झाली तेव्हा एकदम रिते रिते झाले, कारण हे सात दिवस 
आम्ही घरदार ,संसार विसरून भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला होता . मंदिरात असलेले हेच ते भव्य वडाचे झाड . 


ज्याच्या भोवती बायका प्रदक्षिणा घालून पूजा करत होत्या,ज्याच्या खाली बसून शुकाचाऱ्याने भागवत कथा सांगितली . 
आम्ही भागवत कथा संपल्या नंतर दिल्ली येथे अक्षर धाम मंदिर पाहण्यासाठी गेलो ,हे आपल्या भारतात सर्वात भव्य असे मंदिर आहे . 


त्यानंतर आम्ही राष्ट्रपती भवन येथे मुघल गार्डन बघण्यासाठी गेलो ,जे वर्षातून फक्त फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना बघण्यासाठी खुले असते .                                                                                                                  


                        या गार्डन मध्ये वर्षातून एकदाच फुलणारी  टूलिपची फुले तसेच दुर्मिळ असे डेलिया, झेंडू वेगळी शेवंती अशी सुंदर सुंदर फुले फुलतात .                                

           
                                                                           
तसेच विविध फुलांचे ताटवे ,औषधी वनस्पती,खूप जुने वडाची झाडे पण होती, तसेच बोन्साय केलेली झाडे पण होती. 



विविध फुलांनी गालिचे काढले होते, तसेच गोलाकार विविध फुले लावून आत कारंजी सुरु केलेली होती . 


विविध रंगांची फुले फुलल्यामुळे सगळीकडे डोळ्याला सुखद दृश्य दिसत होते .                        



पूर्ण मुघल गार्डन बघण्यासाठी २ ते ३ तास लागले तरीही तिथून बाहेर पडावेसे वाटत नव्हते,पण गार्डन बंद झाल्याने आम्हाला   बाहेर यावे लागले . अशा तर्हेने आमची हि सप्ताह कम दिल्ली टूर खूप समाधान कारक झाली . 


असे भागवत सप्ताह वारंवार होत राहावेत ,त्या निमित्ताने भगवंताचे सानिध्यात राहून नामस्मरण करण्याचे भाग्य 
लाभते 









                                                                     

Saturday, October 22, 2016

व्हर्जिनिया मेरीलँड डीसी ट्रिप

आम्ही Windsor वरून ५ August रोजी दुपारी निघून प्रथम एडीसन येथे रात्री मुक्काम केला,  एडिसन ३ तास , तिथून वॉशिंग्टन ४ तास,तिथून रिचमंड २ तास असा ९ तासाचा प्रवास करून माझी भाची कविता हिच्याकडे Glen Allan या गावी गेलो ,अंतर अंदाजे ६०० मैल होते .                                                                                                                       या प्रवासात आम्ही प्रथम पेनसिल्व्हेनिया या राज्यातून गेलो, त्यानंतर मेरीलँड आणि नंतर व्हर्जिनिया असा प्रवास करत Glen Allan या गावी पोचलो .                                                                                                                        

                आम्हाला वाटेत बाल्टिमोर हे खूप मोठे शहर लागले, हे शहर इंडस्ट्रियल असून इथून डेलावेअर हि भव्य नदी वाहते .  या नदीवर भव्य ब्रिज असून हे मोठे हार्बर आहे.  इथून परदेशात जहाजे जातात तसेच इथून खूप मोठ्या व्यापाराची देवाण घेवाण होत असते . 
                 

               डेलावेअर नदीच्या खालून रस्ता तयार केला आहे त्या टनेल खालून जाताना मज्जा येते. रंगी बेरंगी लाईट्स लागतात तसेच कधी नदीखाली गेलो आणि कधी बाहेर आलो कळत नाही. 
                                              

                  प्रवासात रस्ता कळण्या साठी  GPS प्रणाली वापरली जाते त्यात असे सांगितले कि, रस्त्यात अपघात झाला आहे १ तास उशीर लागेल पण मला हाच रस्ता योग्य वाटतोय, दुसरा पर्यायी रस्ता सापडला तर मी तुम्हाला अवश्य सुचविन. पहा किती हायफाय यंत्रणा आहे.                                                                                                    
              आम्ही मध्ये वॉशिंग्टन जवळ ग्रेट फॉल या ठिकाणी थांबून जेवण घेतले आणि फॉल बघितल  हा फॉल पोटोमॅक या रिव्हर वर असून, खूप सुंदर आहे . 

            

             नदीच्या एका बाजूला मेरीलँड आणि दुसऱ्या बाजूला व्हर्जिनिया हे राज्य आहे, नदी दोन्ही राज्याच्या मधून वाहते. आम्ही Glen Allan  या गावी संध्याकाळी ६. ०० वाजता पोचलो .                                                        
           ७ ऑगस्ट आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस, सर्वानी मिळून केक आणला आणि सेलेब्रेशन केले . तसेच त्यांनी तो कापला आणि  नंतर  आम्ही Glen  Allan पासून १३० मैलावर असलेल्या व्हर्जिनिया सफारी पार्क पाहण्यासाठी गेलो .                    

             या ठिकाणी आपल्याच गाडीतून फिरायचे आणि जंगलात मुक्त  फिरणारे प्राणी बघायचे.  खऱ्या जंगलातच प्राणी फिरत असल्याने त्यांना पाहण्याचा आनंद काही औरच. जिराफ, झेब्रा, नीलगाय, वाघ, लमा, शहामृग असे अनेक प्रकारचे प्राणी मुक्तपणे फिरत होते,  हरीण तर इतक्या प्रकारचे होते कि काही विचारू नका .  
                          


            खूप वर्षाची मोठी कासवे तसेच पिवळा अजगर पण होता. तसेच आपण जंगलात प्रवेश करताना एका डब्यात प्राण्यांचे खाद्य देतात ,ते घेऊन गाडीतून आवाज करायचा कि असतील तेव्हढी हरीण,शहामृग आपल्या गाडीजवळ येतात आणि डब्यातील खाद्य खातात, हि गोष्ट खूप वेगळी वाटली. 
                       

            आम्ही अनेक सफारी पार्क बघितले पण असा प्रकार कुठेच नव्हता. पोरांनी तर खूपच एन्जॉय केले. ते बाहेरच यायला तयार नव्हते. इतके नैसर्गिक वातावरण आणि त्यांना खाऊ घालणे हा प्रकारचं अनोखा होता. 

                       



                      आपल्या डब्यातील खाद्य खाताना  इतके जोराने डबा ओढत कि ,आपण बेसावध असू तर डबा  सांडुनच जाईल. आम्ही असे बऱ्याच प्राण्यांना खाऊ घातले. काही हरीण तर रामायणातील कांचन मृगाप्रमाणे शरीरावर पिवळे ठिपके असलेले होते. 

                      

             
            एका हरणाचे शिंग वारा घेण्याच्या पंख प्रमाणे पसरलेले होते तर मोर सगळीकडे मुक्त पने संचार करत होते. 
                                               

                अनेक प्रकारचे वाघ, कांगारू,पक्षी हे प्राणी गुण्या गोविंदाने एकत्र वावरत होते.  आम्हाला गेटवर एक छोटी काडी दिली होती, त्याला काहीतरी चिकट पदार्थ लावला होता, ती काडी त्या पक्षा  समोर धरली कि, तो आपल्या काडीवर बसत असे. हा पण प्रकार नवीनच होता . 

                 


                     वेगवेगळे पक्षी तसेच अनेक प्रकारची प्राणी आणि सर्प प्रकारातील तसेच शेळ्या, कांगारू पण होते . नीलगाय, शहामृग,जिराफ,पांढरा वाघ सगळे प्राणी मुक्तपणे संचार करत होते. 
                       
           

                जाळीच्या पिंजऱ्यात पेंग्विन, पांढरे मोर, रंगीबेरंगी पक्षी, चिमण्या, असे प्राणी होते. पक्षी आपल्या हातावर सुद्धा येऊन बसत असे, तो आपल्या खांद्यावर देखील येऊन बसत, त्यामुळे एक वेगळीच भावना मनात उत्पन्न होत असे. हा पण एक वेगळाच अनुभव होता . 

              संपूर्ण दिवस आमचा कसा गेला कळलेच नाही, खरंच हा अनोखा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला . वाटेत एका सुंदर पॉईंट वर थांबून चटकदार भेळ खाल्ली आणि आमचा आजचा दिवस संपला . 

           


   
              ८ तारखेला आम्ही विश्रांती घेतली, पण श्रावण महिना असल्याने आम्ही संघ्याकाळी  इथून जवळ असलेल्या  स्वामी नारायण मंदिरात गेलो. तेथे अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. श्रावण महिना असल्याने शंकराच्या पिंडीजवळ दुधाचे भांडे भरून ठेवले होते. प्रत्येकाने दुध  घेऊन वाहायचे. बेलाची पाने पाहून तर आश्चर्यच वाटले . 

              


                मंदिरात बरेच लोक शंकराची १०८  नावे वाचत होती, शिवस्तोत्र म्हणत होती, तसेच भजन पण म्हणत होती, त्याचा आम्हाला लाभ झाला. श्रावण महिना असल्याने अचानक आम्हाला भक्तीचा आनंद मिळाला, त्यामुळे खूप प्रसन्न वाटले . 

            

                  
                    मंदिराच्या बाहेर खूपच छान वातावरण होते, एकदम प्रसन्न वाटत होते, सुंदर सुंदर झाडे लावून सुंदर बाग केलेली होती . 

                


                        ९ ऑगस्ट माझी भाची कविता हीचा  वाढदिवस आज पण आम्ही केक कापून तो सेलिब्रेट केला .सगळ्यांनी तिला विश केलं आणि आम्ही आज रिचमंड पासून ६५ मैलावर असलेल्या जेम्स टॉऊन हे ठिकाण पाहण्यास गेलो. 
        


                सकाळी सकाळी आम्ही सगळे आटोपूण सोबत खूप पदार्थ घेऊन निघालो, इथे  गुजराती बायका आपल्याला हवे ते पदार्थ बनवून देतात, फक्त त्यांना सामान नेवून द्यायचे कि झाले . 
                      


                 जेम्स टाऊन हे गावाचे नाव असून, इंग्रज चार महिने बोटीने प्रवास करून अमेरिकेत आले. प्रथम इथे म्हणजे व्हर्जिनिया या ठिकाणी आले. १६०७ साली हे लोक अमेरिकेत आले. त्याचा इतिहास इथे दाखवला आहे . 


                 पूर्वी लोक कसे चुलीवर भाजून  अन्न खात असत, तसेच त्यांचे जुने  जीवन तसेच १६०७ ते १७०० पर्यंत चा इतिहास दाखवणारी १० दालने आहेत . 



           इंग्रज लोकांनी कसे अत्याचार केले, मेक्सिकन लोकांना गुलाम सारखे वागवले त्यांच्या कडून कामे करून घेतली तसेच इंग्रजांनी हळू हळू जागा बळकावल्या आणि इथे आपले बस्तान बसवले हा सर्व इतिहास या  ठीकाणी दाखवला आहे. ज्या बोटीतून हे लोक आले त्या बोटी पण तिथे लावल्या आहेत . 
   


               त्यावेळी बोटीतून जे खलाशी लोक आले तसा वेष करून बोटीमध्ये लोक बसवले आहेत ते आपल्याला माहिती देतात . 

             


              इंग्रज लोक नेटिव्ह  इंडियन लोकांना पैसे देऊन त्यांच्या कडून धान्य घेत असत आणि त्या बदल्यात त्यांच्या कडून कामे पण करू घेत असत. समुद्र काठी बोटी लावून त्या वेळची शस्त्रे ,अस्त्रे,घरे, संस्कृती असे सर्व तयार केलेले आहे, एक गावचं तिथे तयार केलेले आहे . 

                   


          १० ऑगस्ट ला आम्ही रिचमंड वरून सकाळी निघालो, आम्हाला माझा भाचा संजू जो Gaithersburg ला राहतो त्याच्याकडे  जावयाचे होते, पण वाटेत आम्हाला माऊंट Vernon  हे अमेरिकेचे पूर्व प्रेसिडेंट George  Washington यांचे घर आहे, ते पाहून मग आम्ही पुढे जाणार होतो . 

        



                दर्शनी भागातच त्याचा आणि मुले,पत्नी यांचे पुतळे आणि घराचे मॉडेल लावलेले आहे . त्यांच्या घराजवळून भव्य अशी potomak हि नदी वाहते, नदीच्या काठी सुंदर अशा जागी त्यांचे घर बांधलेले आहे आणि काही स्त्रिया एकत्र येऊन त्यांनी हे स्मारक जतन  केले आहे. त्याच सर्व स्मारकाची देखभाल करतात . 

                


             George  Washington यांची इथे समाधी आहे, तसेच त्यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म इथे वेगवेगळ्या थिएटर मध्य ३० मिनिटांनी दाखवत असतात . त्यांच्या मालकीचे चहाचे मळे होते ते गर्भ श्रीमंत होते परंतु ते सर्व त्यागून त्यांनी सैन्यात भरती केली आणि देशासाठी सेवा केली . 

       

                   वरील ठिकाणी त्यांची समाधी असून त्यांनी आपल्या ५७ वर्षाच्या आयुष्यात सर्व श्रीमंती  त्यागून देशासाठी खूप मोठी सेवा केली. त्यांचे घर, घोड्याची पागा, शस्त्रे, सगळे सुंदर पद्धतीने जतन केले आहे, संपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी कमीत कमी ५ तास लागतात . छोट्या छोट्या ग्रुप ला आत सोडतात . 

                   


              आम्ही हे सर्व पाहून संजूच्या गावी Gairthersburg येथे गेलो. दुसरे दिवशी थोडा आराम केला आणि संध्याकाळी इस्कॉन टेम्पल मध्ये गेलो, मंदिर खूप छान होते . त्याची कॉलनी खूप सुंदर आणि सगळीकडे हिरवी हिरवीगार घनदाट झाडे होती . 

                

                  १२ ऑगस्ट प्रीती आणि श्रीकांत सकाळीच वॉशिंग्टनला गेले. संजूच्या घरापासून हे फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.  त्यांनी संध्याकाळची  Washington Monument आणि Bureau of Engraving and Printing  ची तिकिटे काढून आणली कारण आधी तिकिटे काढल्या शिवाय इथे जात येत नाही . 
                 

             त्यांनी  दिलेल्या वेळेवरच आपल्याला आत सोडले जाते उशीर झाला तर आत सोडत नाहीत. आपल्या इंडिया मध्ये चोकशी केली तर तिथे परवानगी नाही असे कळले. पण इथे आत गेल्या गेल्या आधी १५ मिनिटाची शॉर्ट फिल्म दाखवतात, त्यानंतर एका काचेच्या पुलावरून आपल्याला ४५ मिनिटाची राईड करवतात. त्यात Dollar  कसे तयार होतात, त्याची प्रोसीजर दाखवतात, तिथे असे लिहिले आहे कि तुम्ही दिवसभर एव्हढे पैसे हाताळता पण तुमच्या  नशिबात असतील तेव्हढेच पैसे तुम्हाला मिळतील. 



          प्रथम कागदाचे मोठे शीट असते, त्यावर एका वेळी ३२ नोटा छापतात त्यानंतर त्याचे २ भाग करतात, त्यानंतर एक एक सुटया  सुट्या नोटा होतात, त्यानंतर प्रत्येक नोटांची बंडल होते, ते एका गोल चाकाला गुंडाळले जाते, परत ते सरळ जाऊन परत त्याचे १०० नोटांचे बंडल तयार होते, परत एक बाई प्रत्येक नोट हाताने मोजत होती. अशा खूप प्रकारे नोटा तयार होतात, पाहायला खूप मजा येत होती, कारण असे कधी आपल्याला पाहायला मिळेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते . 
                                  


              त्यानंतर आमची Washington Monument ची वेळ होती, हे Monument कुठूनही दिसते, मागच्या वेळी आम्ही ते बाहेरून बघितले होते पण यावेळी वरून view पाहायला मिळणार होता . 

              

        ५५५ फूट लिफ्टने जाण्यासाठी आम्हाला १ मिनिट सुद्धा लागला नाही, वरून बघितलेला नजर काही औरच होता,चारही बाजूने संपूर्ण वॉशिंग्टन शहर दिसत होते . 
                                       

             आम्ही जेव्हा टॉवर वर गेलो ती वेळ इतकी सुंदर होती कि, त्यावेळी सूर्य नुकताच अस्ताला जात होता, सूर्याची लाल, केशरी किरणे सगळीकडे पसरली होती, त्यातच एक विमान पण जवळून गेले, हा नजारा पाहून आम्ही एकदम तृप्त झालो. एका बाजूने आम्हाला दूरवर असलेली कॅपिटॉल बिल्डिंग दिसत होती . 
                                                

         टॉवर च्या चारही बाजूने वेगवेगळे पॉईंट केले होते त्यातून आम्हाला वेगवेगळे दृश्य दिसत होते, एका बाजूने व्हाईट हौऊस, एका बाजूने कॅपिटल बिल्डिंग, एका बाजूने लिंकन मेमोरियल, आणि एका बाजूने वॉर मेमोरियल अशी वेगवेगळी दृश्य पाहून आम्ही एकदम हरखून गेलो . 
                             
           
                   मागच्या वेळी आम्ही व्हाईट हाऊस बघितले होते, पण आता परत आम्हाला बघण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही परत एकदा व्हाईट हाऊस पाहण्यासाठी गेलो. वाटेत आम्हाला रिझर्व्ह बँक दिसली, ती  इमारत पण भव्य आणि सुंदर होती. 
                



         आम्ही वॉशिंग्टन मोनुमेंट पासून व्हाईट हाऊस येथे चालत गेलो कारण हि सर्व ठिकाणे एकमेका पासून हाकेच्या अंतरावर आहेत, पाच ठिकाणे एकाच गोलात आहेत. लिंकन मेमोरियल, व्हाइट हाऊस, वॉर मेमोरियल, कॅपिटॉल बिल्डिंग आणि  जेफरसन  memorial  हि पाच ठिकाणे एकाच परिघात येतात. आम्ही गेलो ती पौर्णिमेची रात्र होती, त्यामुळे चंद्र मोनुमेंटच्या बाजूने शीतल असा प्रकाश देत होता, हे दृश्य अप्रतिम होते . 
    

             आम्ही रात्रीच्या ९ वाजता व्हाईट हाऊस येथे गेलो तरीही हाऊस बाहेर खूप गर्दी होती  लोक फोटो काढण्यासाठी थांबले होते, जेव्हा सिक्युरिटी वाल्या माणसाने सर्वाना बाहेर काढले तेव्हाच लोक तिथून हलले.आपल्या भारत सारखी खूप टाईट सिक्यूरीटी नव्हती अगदी गेट जवळ जाऊन आम्ही फोटो काढले . 


                  आम्ही आज मनसोक्त वॉशिंग्टन येथे फिरलो आणि आमची  ८ दिवसाची वर्जिनिया ट्रिप संपली आम्ही दुसरे दिवशी संजू कडे परत गेलो, दुपारी त्याने एका इंडियन हॉटेल मध्ये ट्रीट दिली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, ८ दिवस फिरण्यात कसे गेले हे समजलेच नाही, पण खूप साऱ्या आगळ्या वेगळ्या गोष्टी या ट्रिप मध्ये बघायला मिळाल्या त्यामुळे खूप समाधान वाटले . 


           माझ्या मुलीमुळं आम्हाला असे वेगवेगळे जग पाहायला मिळते त्यामुळे आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. देव सर्वाना अशाच मुली देवोत अशी प्रार्थना करावीशी वाटते .